प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात
भटकंती करता करता एका इसमाला सिंह भेटला. तोही रानावनांतून भटकतच होता. ते दोघे एकमेकांसमवेत फिरू लागले. प्रवासात ते एकमेकांचे मित्र बनले. चालता चालता त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. दोघेही आत्मप्रौढी सांगू लागले. "मी याँव करतो आणि त्याँव करतो," असे दोघेही सांगू लागले. आपण सिंहापेक्षा श्रेष्ठ असे माणूस त्याला सांगू लागलो तर मी माणसापेक्षा श्रेष्ठ असे सिंह त्याच्या गळी उतरवू लागला. दोघांमध्ये वादविवाद रंगला. एकमेकांशी वाद घालत ते एका पुतळ्यापाशी आले. हा पुतळा एका ताकदवान माणसाचा होता. सिंहाला जणू चिरडून टाकण्याचा आवेश त्या माणसाचा होता आणि तो सिंहाशी कुस्ती खेळत होता. हा पुतळा बघितल्याबरोबर तो माणूस सिंहाला म्हणाला, “तो बघ ! तो बघ ! आता तरी माणूस सिंहापेक्षा श्रेष्ठ हे तुला पटते की नाही? याचा आणखी वेगळा पुरावा तो काय हवा?' सिंहाने त्याला थांबवले. तो म्हणाला, “मित्रा,थोडा थांब, एवढी घाई करू नकोस आताच. याबाबत तू फक्त तुझे मत सांगतो आहेस. तू एकच बाजू दाखवतो आहेस. जर आम्हा सिंहांना पुतळे उभारता आले असते तर निश्चितच खात्री बाळग. सिहांनी माणसांना चिरडतांनाच त्या पुतळ्यात दाखवलं असतं. सिंहाच्या या उत्तरावर त्या माणसाकडे काहीच प्रत्युत्तर नव्हते. न तो खजिल झाला. दोघांमधील भाडण शमले. दोघेही थंडावले आणि न पुढे चालू लागले.
No comments:
Post a Comment