Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Wednesday 17 March 2021

जीवनात खेळाचे महत्व

           जीवनात खेळाचे महत्त्व 



        माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, खेळ ही मानवाची सहजप्रवृत्ती आहे. जीवनातील अनेक वृत्तींचा विकास करणारी शक्ती आहे. शरीरातली ऊर्जा आणि भावना यांना योग्य मार्ग मिळवनू देणारी युक्ती आहे आणि म्हणून मानवी जीवनामध्ये खेळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. मैदानावरील खेळांमुळे शरीराला व्यायाम होतो. शरीरातील अवयवांची योग्य हालचाल होऊन त्यांची क्रियाशीलता वाढते मैदानावर उभ्या असलेल्या खेळाडूच्या अंगी आपोआपच उत्साह संचारतो. मनावरील ताण कमी करायला खेळाची मैदाने मदत करतात. अशा प्रकारे शरीराच्या विकासासाठी आवश्यक असणारे खेळ हे माध्यम मनाच्या विकासालाही पोषक ठरते.        

              बुद्धिबळासारखे खेळ विचारशक्ती वाढवतात, निरीक्षण शक्तीचा विकास करतात. खेळातून मनोरंजन तर होतेच पण त्याचबरोबर मनावर देखील कळत- नकळत अनेक संस्कार बिंबवले जातात. खेळातून निर्माण होणारी खिलाडूवृत्ती जीवनाच्या प्रवासात पदोपदी उपयोगी पडते. दिवसभर मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूच्या अंगी प्रचंड सहनशीलता आपोआपच बाणवली जाते. शाळेच्या संघातून खो-खो, कबड्डी यांसारखे खेळ खेळताना आपोआपच विद्यार्थ्यांच्या मनावर जिद्द, चिकाटी, समूहभावना या गोष्टींचे संस्करण होते.      

               संघनायकाची भूमिका बजावणारा विद्यार्थी भावी जीवनामध्ये समाजाचे नेतृत्व करू शकतो. सामना संपल्यावर जिंकलेले व पराभूत झालेले खेळाडू एकमेकांना हस्तांदोलन करतात. त्यातूनच पराभव झाल्यास निराश व्हायचे नाही आणि । यश मिळाल्याने जास्त हुरळूनही जायचे नाही असा संस्कार त्या मनामध्ये रुजवला जातो. ( खेळाडूंच्या सध्या क्रीडाशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून विकसित होत आहे. स्पर्धेच्या या युगात खेळ हे क्षेत्रसुद्धा मागे नाही. शालेय पातळीपासून ऑलिम्पिकपर्यंत खेळाच्या विविध स्पर्धा घेतल्या जातात. त्यातून मोठ-मोठे खेळाडू तयार होतात. विशिष्ट क्रीडा प्रकारात करिअरसुद्धा निर्माण होऊ शकते. 

               सचिन तेंडुलकर, विश्वनाथन आनंद, धनराज पिल्ले, सानिया मिर्जा व अभिनव बिंद्रा अशी कित्येक नावे सांगता येतील की, ज्यांना खेळामुळे समाजात, देशात आणि जगातही मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. अशा प्रकारे खेळ हे मानवी जीवताचे अविभाज्य अंग आहे आणि म्हणूनच शाळेच्या वेळापत्रकातील शारीरिक शिक्षणाचे तास प्रत्यक्ष मैदानावरच झाले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी मैदानावर आल्यानंतर खेळाचा स्वच्छंदी आनंद घेतला पाहिजे. पालकांनी विद्यार्थ्यांसाठी बनवलेल्या घरच्या वेळापत्रकामध्येसुद्धा खेळाच्या तासांना स्वतंत्र जागा हवी. कारण आजच्या विद्यार्थ्यांमधूनच उद्याचे राष्ट्र उभे राहणार आहे आणि त्या राष्ट्रउभारणीत क्रीडाक्षेत्राचे योगदानही महत्वपूर्ण असणार आहे. 

जय हिंद!

No comments:

Post a Comment